![]() |
| भयाण भविष्याची ' मूक ' किंकाळी! |
जवळपास संपूर्ण जगातील सध्याची परिस्थिती पाहताना, तुम्ही अगदी हाच प्रश्न ( किंवा ह्याचसारखा नाहीतर ह्यापेक्षाही छोटा प्रश्न ) तुमच्या मनात आल्याशिवाय किंवा तुम्ही उघडपणे विचारल्यावाचून राहणार नाही. जरा तुमच्या घाईगडबडीच्या दिनचर्येतून निदान थोडा वेळ काढून आणि बारकाईने विश्लेषण करून पहा की "पर्यावरण संरक्षण", संसाधनांचे वाटप, (जागतिक-)राजकारण, सहकार्य, विकास, तंत्रज्ञान, विचारसरणी, धर्म आणि अर्थव्यवस्था ह्या बाबतीत किंवा यांच्या नावाखाली "लोकांपेक्षा फायद्याला प्राधान्य", (फाजील-)आत्मविश्वास, स्वकेंद्रितपणा, बेजबाबदारपणा, बेदरकारपणा, कट्टरपणा, अविचार, फसवणूक, चिथावणीखोरपणा, शोषण, अहंकारीवृत्ती, ढोंगीपणा किंवा फसवणूक यांचे प्रमाण नेमकं किती आहे ते ! हवामान, समाज, जीवनशैली, नातेसंबंध आणि माणसांचे वागणे या बाबतीत अनेक लोकांना आजचे जग हे त्या जगापेक्षा (काळापेक्षा) नक्की बरंच वेगळे आहे असं जाणवेल ज्या जगात (काळात) त्यांचा जन्म झाला होता, मग भले तो अगदी काही दशकांपूर्वी झाला असेना का ! बाकीच्या लोकांचे राहू दे ! तुमचं काय ? तुम्हाला आताचे जग कसं वाटतंय ?
हेच एक मुख्य कारण असू शकते कि ज्यामुळे आज जगभरातील करोडो लोकांमध्ये कदाचित पूर्वीपेक्षा कधी नव्हे तितक्या प्रमाणात प्रमाणात घाई, भीती, राग, उदासपणा, तणाव, द्वेष/तिरस्कार, भीती, चिंता, हताशा, निस्तेजपणा, विसरभोळेपणा, निद्रानाश, व्यसनाधीनता, निरर्थकता, भोगीवृत्ती, पलायनवाद, असुरक्षितता, नीरसता, एकटेपणा, असहिष्णुता, विचलितपणा, भ्रमनिरास, अनास्था, अनिश्चितता, अधीरता, असुरक्षिपणा, असंवेदनशीलता, निरुत्साह, दिशाहीनता, असहाय्यता, निराशावाद, उद्देशहीनता, चंगळवाद, भयाण भविष्याची भीती, " काहीच अर्थ नसल्याची " भावना, फसवणुक झाल्याची भावना, जगण्याबद्दलची भीती आणि/किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे - लोप पावत जाणारा विश्वास (नेमका कशाकशावरचा विश्वास लोप पावत चाललाय ? तुम्ही फक्त नावं सुचवा !) या गोष्टींचा फैलाव किंवा ह्या गोष्टींमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. तुम्ही त्या लोकांमध्ये तर नाही का ? नक्की का ? बघा ! एकदा शांतपणे बसा आणि स्वतःला गंभीरपणे विचारा.
" प्रत्येक मनोविकृत (Psychopath) व्यक्ती हा (अत्यंत) आत्ममग्न (Narcissist) असते परंतु प्रत्येक (अत्यंत) आत्ममग्न (Narcissist) व्यक्ती ही मनोविकृत (Psychopath) नसते."
चिकित्सीय मानसशास्त्रज्ञ डॉ. रामणी दुर्वासुला
( आत्ममग्नतेवरील जगातील अग्रगण्य तज्ज्ञ )
चिकित्सीय मानसशास्त्रज्ञ डॉ. रामणी दुर्वासुला
( आत्ममग्नतेवरील जगातील अग्रगण्य तज्ज्ञ )
जर तुमचा असा ठाम विश्वास असेल की मनोविकृत (Psychopath) व्यक्तीमध्ये मानवी भावनांचा पूर्णपणे अभाव असतो तर तुम्ही पूर्णपणे चुकत आहात (माफ करा ! ). तथाकथित " मानवी भावनांचा अभाव " हे एका सामान्य दिसणाऱ्या व्यक्तीला अनैतिक, निष्काळजी, अविचारी, नीतिमत्ताहीन, आत्ममग्न, बेजबाबदार, कपटी, खोटारडी, अत्याचारी, परजीवी, केवळ आपलाच फायदा बघणारी आणि इतरांचे शोषण करणारे बांडगूळ बनवत नाही. खरं तर, मनोविकृत व्यक्तीमध्ये मानवी भावना असतात, पण त्यांना इतरांच्या भावना, संवेदना आणि दुःखाची पर्वा नसते. त्यांच्यामध्ये इतर माणसांच्या किंवा अगदी त्यांच्या जवळच्या व्यक्तींबद्दलही समानुभूती खूप कमी असते किंवा नसतेच. तुम्ही ' समानुभूती ' (सम-अनुभूती म्हणजे समान किंवा एकसारखे बनून राहिल्याची स्थिती) हा शब्द पहिल्यांदाच वाचत आहात का ?
आतापर्यंत तुम्ही नक्कीच आणखी एक शब्द अनेकदा वाचला असेल, ऐकला असेल किंवा कदाचित वापरलाही असेल. तो शब्द म्हणजे ‘ सहानुभूती ’ (Sympathy)! या शब्दासोबतच, ‘ सहानुभूती दर्शवणे ’ (Sympathizing) आणि ‘ सहानुभूतीदार ’ (Sympathizer) हे शब्दही तुम्ही आतापर्यंत अनेकदा वाचले, ऐकले किंवा वापरले असतील. तुम्ही कदाचित इतरांबद्दल तुमची सहानुभूती व्यक्त केली असेल किंवा तुम्ही स्वतः कोणाचे तरी सहानुभूतीदार बनला असाल. तथापि, बहुतेक लोक ‘ सहानुभूती ’ (Sympathy) आणि ‘ समानुभूती ’ (Empathy) या दोन शब्दांमध्ये गल्लत करतात. जरी या दोन्ही शब्दांचा उच्चार जरी एकसारखा वाटलं असला तरी त्यांचे अर्थ मात्र एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. त्यामुळे या दोन्ही शब्दांबद्दल अधिक स्पष्ट समज होणे आवश्यक आहे.
सहानुभूती म्हणजे समोरची व्यक्ती नेमकी कोणत्या परिस्थितीतून जात आहे, तिला काय वाटत आहे किंवा ती काय अनुभवत आहे हे समजून घेण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ! याउलट, समानुभूती म्हणजे तीच भावना स्वतःच्या आत अनुभवण्याचा एक खरा पण अवचेतन अनुभव आहे. सहानुभूतीच्या उलट समानुभूती म्हणजे जणू दुसऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून त्याला खरोखर कसे वाटते हे अनुभवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. एक व्यक्ती जी संकटात, धोक्यात किंवा वेदनेत आहे अशा व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तीची देहबोली (चेहऱ्यावरील हावभाव आणि शरीराची ढब/आसन) आणि आवाजाचा सूर लगेच बदलतो. तुमच्या बाबतीत असे कधीच घडत नाही का ? आठवण्याचा प्रयत्न करा !
![]() |
| समानुभूती हा एक अत्यंत महत्त्वाचा समाजशील गुण आहे. (छायाचित्र सौजन्य: अमेरिकन मानसशास्त्र संघटना) |
एकीकडे समानुभूती हा एक खरा आणि अवचेतन अनुभव आहे. आपल्या आजूबाजूचे लोक आनंदी असताना आपल्याला आनंद होतो आणि जेव्हा ते दुःखी, उदास, रडत असतात, पीडित किंवा निराश असतात तेव्हा आपल्याला दुःख होते. त्याचप्रमाणे, जेव्हा इतर धोक्यात असतात तेव्हा आपल्याला भीती वाटते आणि जेव्हा इतरांचा छळ, शोषण किंवा त्यांना शिक्षा होत असते तेव्हा आपल्याला राग येतो. समानुभूतीचा अनुभव पूर्णपणे अवचेतन असतो. तसेच, समानुभूतीमुळे लगेच शरीरात आंतरिक आणि रासायनिक बदल होतात. म्हणूनच समानुभूतीची अभिव्यक्ती ही शारीरिक, वर्तनात्मक आणि अशाब्दिक असते.
दुसरीकडे, सहानुभूती ही एक अधिक सचेतन प्रक्रिया आहे, ज्यामध्ये दुसरी व्यक्ती सध्या कोणत्या परिस्थितीतून जात असेल किंवा भूतकाळात गेली असेल याची कल्पना करण्याचा, ते समजून घेण्याचा किंवा त्याचे दृश्य डोळ्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. सहानुभूती शब्दांद्वारे व्यक्त केली जाते. विशेषतः, सहानुभूती ही सहमती, अनुमोदन/पाठबळ, आधार किंवा समर्थनाच्या स्वरूपात असू शकते. परंतु नकळतपणे जाणवणारा तोच आंतरिक त्रास किंवा अस्वस्थता यात अनुभवली जात नाही. म्हणून सहानुभूतीची नक्कल केली जाऊ शकते पण समानुभूतीची नक्कल करता येत नाही !
आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आपल्याला सुसंस्कृत बनवते पण समानुभूतीपूर्वक वागल्याने आपण खऱ्या अर्थाने सामाजिक बनतो. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय वाटत असेल, ती कोणत्या परिस्थितीतून जात असेल किंवा गेली असेल याचा आंतरिक अनुभव घेते तेव्हा त्या दोन व्यक्ती अक्षरशः ' एकच ' होऊन जातात. इतकेच नाही तर पहिली व्यक्ती संकटात, धोक्यात किंवा वेदनेत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला अशाब्दिकपणे आणि शारीरिकरित्या मदत करू शकते, दिलासा देऊ शकते, वाचवू शकते, संरक्षण देऊ शकते किंवा तिच्यासाठी लढूही शकते.
" आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आपल्याला सुसंस्कृत बनवते पण समानुभूतीपूर्वक वागल्याने आपण खऱ्या अर्थाने सामाजिक बनतो. "
सहानुभूती नव्हे तर समानुभूती हाच मानवतेचा, नीतिमत्तेचा आणि नैतिकतेचा खरा पाया आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर दुसऱ्याबद्दल दयाभाव, नियमबद्धपणा, जबाबदारपणा, संवेदनशीलपणा, खरेपणा, नैतिकता आणि एकमेकांची काळजी घेणारे वागणे. एकमेकांसोबत मानवीय, नैतिक आणि नियमबद्ध वागण्यामध्ये झालेल्या घसरणीबद्दल जी आज जगभरात चाललेली ओरड आहे ती मुळातच समानुभूती लोप पावत चालल्याचा एक स्पष्ट संकेत आहे. लाखो वर्षांपासून आपल्याला एकमेकांसोबत टिकून राहण्यास आणि भरभराटीस मदत करणाऱ्या अनिवार्य गुणांपैकी एक म्हणजे समानुभूती दुर्दैवाने लोप पावत चालली आहे.
[ ' राखीव ' समानुभूती: कोणत्याही (सामान्य) माणसाला इतर प्रत्येक माणसाबद्दल समानुभूती (Empathy) वाटणे ही अत्यंत नैसर्गिक, उपजत, सहजस्फूर्त किंवा अगदी आध्यात्मिक बाब आहे. असे असून देखील, (भू-)राजकीय चळवळ, कट्टर विचारसरणी किंवा जमातवाद (Tribalism) आपल्या अनुयायांना, समर्थकांना किंवा सदस्यांना पद्धतशीरपणे फसवण्याचा, मुद्दामून प्रवृत्त करण्याचा किंवा त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांची समानुभूतीपूर्ण बांधिलकी, वागणूक, योगदान, धडपड किंवा कृती केवळ त्याच चळवळीचे, विचारसरणीचे किंवा जमातीचे इतर अनुयायी, समर्थक किंवा सदस्य यांच्यापुरतीच मर्यादित किंवा ' राखीव ' राहील. ]


Comments
Post a Comment